नवी दिल्ली – महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त भाजरपचे 7 कोटी कार्यकर्ते देशभर खादीचा प्रचार करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज ही घोषणा केली.
गांधी जयंती निमित्त नड्डा यांनी खादी इंडिया स्टोअरला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आजपासून भाजपचे देशभरातील कोट्यवधी कार्यकर्ते खादीचा प्रचार करणार आहेत. खादीचा वापर वाढवण्यासाठी हा प्रचार केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत’ आणि “व्होकल फॉर लोकल’ची हाक दिल्यामुळे खादी उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे, असेही नड्डा यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. त्याबरोबर स्वतंत्र भारताच्या संकल्पनेत अग्रणी राहण्यावरही त्यांनी भर दिला होता, असेही नड्डा यांनी सांगितले.
देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीबद्दल नड्डा यांनी त्यांचेही स्मरण केले. स्वभावाने अत्यंत मृदू असलेले शास्त्री हे ठाम निर्णय घेणारे होते. ते अत्यंत थोड्या काळासाठी पंतप्रधान राहिले. मात्र त्या थोड्या कालावधीतही त्यांनी आपल्या विचारांनी देशाला दिशा दिली, असे नड्डा म्हणाले.