नवी दिल्ली – पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून धान खरेदी 11 ऑक्टोबरनंतर करण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी जाहीर आक्रोश केला.
हरियाणाचे मुख्यमंत्र्यांसह अनेक खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि कृषीमंत्री जे. पी. दलाल केंद्रीय मंत्र्यांकडे या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
दरम्यान, दिल्लीला रवना होण्यापुर्वी खट्टर म्हणाले, धान खरेदी शेतकऱ्यांना कोणतेही अडथळे येणार नाहीत. कर्नाल येथील खट्टर यांच्या निवासस्थानाजवळ शेतकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. खट्टर यांच्यासह भारीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदारांच्या घराबाहेर शेतकऱ्यांनी तंबू ठोकून दीर्घकाळ निदर्शनांची तयारी केली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. भाजपा आमदार असीम गोयल यांच्या घराबाहेरही शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.
बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांची बॅरिकेडस् तोडून निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे.
हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस हिंसक बनत आहे. महात्मा गांधी यांच्या देशात हिंसक आंदोलन मान्य नाही. निदर्शने करताना शेतकरी नेत्यांनी संयम बाळगायला हवा.
भारतीय किसान युनियनचे गुरनामसिंग चुदानी म्हणाले, धान खरेदीत उशीर करू नये म्हणून आम्ही सरकारला या आधीच इशारा दिला होता. शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होऊ नये, म्हणून सरकारने खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसे झाले नाही तर सरकारला व्यापक निदर्शनांचा सामना करावा लागेल.
धान खरेदी उशीराने करण्याच्या निर्णयाने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी माध्यमांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला वाचायचे असेल तर आमच्यासोबत या अन्यथा तुम्हालाही सरकारचा त्रास सहन करावा लागेल.
संयुक्त किसान मोर्चाने हे आंदोलन जाहीर करताच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी उभारलेले अडथळे शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त केले.
कर्नाल येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले आहेत.