पुणे – ग्रामीण भागातील अस्सल इरसालपणा शब्दांमध्ये मांडून मराठी समाज जीवनाला खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे शनिवारी निधन झाले. कथाकथनाच्या माध्यमातून मराठी साहित्य खेडोपाड्यात पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मराठी विनोदी साहित्याची परंपरेला ग्रामीण विनोदाची भर घालत समृध्द करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
मिरासदार 94 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून वयोमानामुळे त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी झाला होता. परळी वैजनाथ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिरासदार यांनी भूषविले होते. मूळचे पंढरपूरचे असणारे मिरासदार यांनी केवळ कथा लेखन न करता लोकांना कथा सांगत कथाकथनाची व्याप्ती वाढविली. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह त्यांनी महाराष्टृाच्या कानाकोपऱ्यात कथाकथनाचे कार्यक्रम केले आणि साहित्यगंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
दत्ताराम मारुती तथा द. मा. मिरासदार यांनी काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी 1952 मध्ये ते शिक्षक बनले. पुढे 1962 मध्ये ते प्राध्यापक बनले. शिक्षक, लेखख या पेक्षा गोष्टीवेल्हाळ कथाकथनकार हीच त्यांची ओळख बनली होती.
मिरासदारांच्या “व्यंकूची शिकवणी’, “माझ्या बापाची पेंड’, “शिवाजीचे हस्ताक्षर’, “भुताचा जन्म’, “माझी पहिली चोरी’, “हरवल्याचा शोध’ आदी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरणामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. “गप्पागोष्टी’, “गुदगुल्या’, “मिरासदारी’, “गप्पांगण’, “ताजवा’ आदी कथासंग्रह, विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहील्या. “एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत.
ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. “स्पर्श’, “विरंगुळा’, “कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही टिपले. “एक डाव भुताचा’ आणि “ठकास महाठक’ या चित्रपटांच्या संवादलेखनाबाबत त्यांना पारितोषिके मिळाली होती. “व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन “गुरुकृपा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. द. मा. मिरासदार यांच्या “भुताचा जन्म’ या कथेवरील शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली.
मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. यामध्ये नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, ज्ञानू वाघमोडे या पात्रांचा समावेश आहे. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. मिरासदार यांना “विंदा करंदीकर जीवनगौरव’, “पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.
साहित्य संमेलनातील हास्यकल्लोळ
पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 83 वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी ‘भुताची गोष्ट’ ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढउतार, छोट्या छोट्या प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रे श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी करण्याची त्यांची क्षमता 83 व्या वर्षीही अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.