बेंगळुरू – कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हटले आहे की, आपला पक्ष कर्नाटकला द्वेष आणि कुशासनाच्या भाजपच्या प्रयोगांची प्रयोगशाळा बनू देणार नाही. कॉंग्रेस पक्ष प्रेम, शांतता आणि सौहार्दाच्या मार्गाने कर्नाटकची खरी क्षमता दाखवून देईल, असा विश्वासही राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांची कर्नाटकातील भारत जोडो यात्रा कर्नाटकातून आज तेलंगणात दाखल झाली त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
ते म्हणाले की, कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, कर्नाटकच्या समृद्ध संस्कृतीची कास धरीत आम्ही कर्नाटकची खरी क्षमता सिद्ध करून दाखवू. वाढत्या खर्चामुळे, अनिश्चित उत्पन्नामुळे आणि किंमतीतील चढ-उतारामुळे प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
वारंवार प्रयत्न करूनही तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या संधी मिळत नाहीत, उद्योजकांच्या अडचणींमुळे त्यांना बाजारपेठा बंद होत आहे. समाजातील अनेक घटक आपले उत्पन्न कधी वाढेल याकडे डोळे लाऊन बसले आहेत. या लोकांना त्यांच्या गरजेनुसार सरकारकडून उपाययोजना अपेक्षित आहेत पण प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येत आहे.
इतिहासाचे व संस्कृतीचे विकृतीकरण सुरू आहे असे त्यांनी नमूद केले. लिंगायत पंथाचे संस्थापक व 12व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वरांच्या शिकवणीच्या विरोधात राज्यातील भाजप सरकारची वर्तणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला.गुरु बसवण्णा यांनी “चोरी करू नका,कोणाला मारू नका, खोटे बोलू नका, रागावू नका, इतरांबद्दल असहिष्णु होऊ नका” अशी शिकवण दिली होती, परंतु कर्नाटकात भाजपने त्यांच्या शिकवणीच्या अगदी उलट काम केले आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.