गांधीनगर – संसदेच्या दोन्ही सदनात भाजपला बहुमत मिळाल्यावर काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.
ते गुजरातमधील वलसाडच्या धरमपूरमधील सभेत बोलत होते. या निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा प्रमुख मुद्दा असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कलम 370 रद्द करण्याचा उल्लेख आहे. संसदेत दोन्ही सदनात बहुमत मिळाल्यावर कलम 370 रद्द करण्यात येईल. त्यामुळे जम्मू-काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग बनणार आहे. या राज्याला देशापासून वेगळेपण देणारे हे कलम रद्द करून राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत विकासासोबतच राष्ट्रीय सुरक्षा हा प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सर्व भागात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. देशाचा विकास करण्यासह देशाला सुरक्षा देण्याचे काम फक्त नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच सरू शकते, असेही ते म्हणाले. फक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात, त्यामुळे जनतेने मजबूत सरकार निवडून द्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आपल्या वीर जवानांनी एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यानंतर देशभरातून जवानांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांचे शौर्य आणि सामर्थ्य जगाला समजले. देश आनंदात असताना दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने कॉंग्रेस दुःखात होती, असेही ते म्हणाले.