बन्सवारा (राजस्थान) – भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात दोन हिंदुस्थान करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला. पूर्वीच्या “युपीए’ सरकारने मजबूत केलेली देशाची अर्थव्यवस्था कमकुवत केली असे म्हणून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली.
कॉंग्रेस पक्ष सगळ्यांना जोडण्याचे काम करतो आहे. तर भाजप तोडण्याचे काम करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. एक श्रीमंतांसाठी आणि दुसरा गरीब, शेतकरी, दलित आणि वंचितांसाठी असे दोन हिंदुस्थान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दोन विचारधारांमधील लढाई सध्या देशात सुरू आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कॉंग्रेस सर्वांचा मान राखते, संस्कृती जपते. तर भाजप दमन करते. इतिहास नष्ट करते. आदिवासींची संस्कृती पुसून टाकते, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दक्षिण राजस्थानमधील आदिवासी बहुल भागात झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधानांनी नोटबंदी आणली. “जीएसटी’ची चुकीची अंमलबजावणी केली. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. देशातील कोणत्याही युवकाला रोजगार मिळू शकत नाही. केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी कायदे आंदोलनामुळे मागे घ्यावे लागले. कारण केवळ 2-3 निवडक उद्योजकांनाच या कायद्यांचा फायदा मिळणार होता, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
देशातील आदिवासींच्या हितरक्षणासाठी कॉंग्रेसनेच काही महत्वाचे कायदे आणले होते. राजस्थानातील अशोक गेहलोत यांचे सरकार आदिवासींच्या हिताचे काम करत असल्याचे कौतुकही राहुल गांधी यांनी केले.