कोलोंबो – श्रीलंकेतील आर्थिक संकट हाताळण्यात अपयश आल्याबद्दल अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या आंदोलकांच्या मागणीला नवनियुक्त पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या महिन्याभरापासून राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी श्रीलंकेत आंदोलन सुरू आहे. कोलोंबोतील गॅल फेस ग्रीन भागात “गोटा गो होम’ नावाने 9 एप्रिलपासून सुरू असलेल्या या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करण्यासाठी आपण एक समिती नियुक्त करणार असल्याचे विक्रमसिंघे यांनी आज सांगितले.
“गोटा गो होम’ या आंदोलनातून देशात बदल घडणार असेल, तर हे आंदोलन सुरू राहिले पाहिजे. देशातील युवकांनी हा बदल घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे विक्रमसिंघे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनीच विक्रमसिंघे यांची काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. विक्रमसिंघे यांच्या पक्षाचा एकच सदस्य असल्यामुळे संसदेतील बहुमतासाछठी राजपक्षे यांच्याच पक्षाने पंतप्रदानांना पाठिंबाही दिला आहे. तरिही अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीला पंतप्रधांनांनी पाठिंबा द्यावा, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रमुख विरोधी पक्षाचा सशर्त पाठिंबा
श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेंगया या पक्षाने पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारला सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. कोणतेच मंत्रिपद न स्विकारता या सरकारला पाठिंबा दिला जाईल, असे या पक्षाने म्हटले आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्थिर सरकार आवश्यक असल्याने हा पाठिंबा दिला जाईल. अध्यक्षांचे अमर्याद अधिकार नियंत्रित करण्याच्या 21 व्या घटनादुरुस्तीबाबत ऍटर्नी जनरलशी चर्चा केली जाईल, असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. हीच या विरोधी पक्षाची प्रमुख मागणी असल्याचे बोलले जाते आहे.