मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले. ते आता लोकांनाही धोका देत आहे. सामान्यांना धोका देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार असून 2024 साली राज्यात भाजप एकहाती सत्ता प्राप्त करेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त आहे. या सरकारने विदेशी दारूवरचा कर कमी केला पण वीजबील माफ केले नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
तसेच धान उत्पादकांना 100 ते 150 कोटी रुपयांचा बोनस हे सरकार देऊ शकले नाही. करोना काळात यशवंत जाधव यांनी 400 कोटींची संपत्ती कमावली. त्यांना भ्रष्टाचारातील फक्त 10 टक्के मिळाले, बाकी 90 टक्के कुठे गेले? असाही सवाल त्यांनी केला आहे.
गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणारे सरकार जनतेला काय न्याय देणार? असा सवाल विचारत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात धान्य राज्य सरकारला दिले होते. पण मोदींचे नाव होईल म्हणून या सरकारने ते धान्य गोदामात सडवले. पण गरिबांपर्यंत पोहोचवले नाही, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका केली.