मुंबई – राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही, असे चित्र दिसत आहे. जळगावात सध्या उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट असल्याचे पाहायला मिळत असून आज 43.5 इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव जिल्हयात उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र दोन दिवसांत ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचे टाळले. एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याच पाहायला मिळत आहे. ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत.
तसेच वाढत्या उन्हामुळे दोन दिवसांपूर्वी एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सध्या असलेले उन्हाची लाट अजून काही दिवस अशीच कायम राहिल्यास अजूनही उष्माघाताचे बळी वाढू शकणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्मघाताची शक्यता आहे.