चंद्रकांत पाटील “होम पिच’वर क्लीन बोल्ड, कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त
कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की वेगळे राजकारण नक्कीच असतं याचाच प्रत्यय 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आले आहे. जे कोल्हापूरकर डोक्यावर घेतात तेच कोल्हापूरकर जमिनीवर आणतात याचा प्रत्यय आला आहे. 2014 सालचा विधानसभेचा निकाल पाहता 2019 साली अपेक्षित असणारा निकाल आणि प्रत्यक्ष लागलेला निकाल पाहता कोल्हापूरकरांनी मतदार राजा श्रेष्ठ असल्याचे दाखूवन दिले आहे.
कोल्हापूरचे सुपुत्र आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घरातच भोपळा मिळाला आहे. भाजपने दोन जागा तर गमावल्याच परंतु शिवसेनेलाही पाच जागा गमवाव्या लागल्या. महायुतीचे उमेदवार काहीही करून निवडून आणायचेच या हेतून घेतलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा निष्प्रभ ठरल्याचे निकालानंतर समोर आले.
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी शाहूवाडी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कोल्हापूर शहरात सभा घेतल्या. त्या चारही ठिकाणी सेनेचा पराभव झाला. युवा सेनेचे अदित्य ठाकरे यांच्या सभांचाही प्रभाव पडला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एकमेव सभा राधानगरी विधानसभा मतदार संघात घेतली. पण या मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार के.पी. पाटील यांचा पराभव झाला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत महाभरती करूनही विधानसभा निवडणुकीत हक्काच्या इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघात दारुण पराभव झाल्याने जिल्हा भाजपमुक्त झाला. बंडखोरीमुळे शिवसेनेलाही फटका बसल्याने महायुतीचे राजकारण करताना पालकमंत्री पाटील यांना नव्याने आखणी करावी लागणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपयश
शेतकरी संघटनेला स्वतःच्या बालेकिल्लामध्ये खूप मोठा फटका बसला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना भविष्यात पिछाडीवर जाऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आजवर आमदारकी, खासदारकी तसेच राज्यातील मंत्रिपद भूषवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिरोळच्या बालेकिल्ल्यातच पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेस आघाडीत सहभागी होत असताना चार जागा हक्काने घेतलेल्या संघटनेला विदर्भातील एकमेव जागेवरच समाधान मानावे लागले.