लखनौ – लखनौ मध्ये गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप भाजपचे खासदार कौशल किशोर यांनी केला आहे. पोलिसांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच ही गुन्हेगारी अनियंत्रीत स्वरूपात वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लखनौ मध्ये गेल्या दोन दिवसांत काहीं जणांच्या हत्या होण्याचे प्रकार घडले आहेत. त्या विषयी मोहनलालगंज मतदार संघातील सत्तारूढ भाजपचे खासदार असलेल्या कौशल किशोर यांनी म्हटले आहे की हत्या आणि लूट आता लखनौ मधील रोजचाच प्रकार झाला आहे.
ते म्हणाले की पोलिसांचा कारभार केवळ खंडणी वसुलीचाच असेल तर लोकांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती नाहीशी होईल. पोलिस आता लोकप्रतिनिधींनाही ऐकेनासे झाले आहेत. पोलिसांच्या कारभारामुळे राज्य सरकारची प्रतिमाही मलिन होत आहे. या भाजप खासदाराने पोलिसांच्या कामाविषयी अशी जाहीर नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यांनी या आधी 17 डिसेंबर रोजीही अशीच टीका केली होती.