पुरूलिया : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात (का) निदर्शने करणाऱ्याची प्रतिमा देशद्रोही अशी रंगवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे, असा हल्ला चढवत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या भगव्या पक्षाला देशभरात एकाकी पाडावे, असे आवाहन केले.
कायदेशीर नागरिक असणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आम्ही राष्ट्रीय लोकसंख्या पटाचे (एनपीआर) आधुनिकीकरण होऊ देणार नाही. आम्ही ते आमच्या राज्यात केले आहे, असे त्या म्हणाल्या.
देशाचे कायदेशीर नागरिक असणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्तयामुळे मी आवाहन करते की, भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र यावे. त्यांना एकाकी पाडावे. पुरूलिया शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची लांबी किमान पाच किमी होती.
जो कोणी शांततेत निदर्शने करतो त्याची संभावना देशद्रोही म्हणून केली जात आहे. जोपर्यंत का कायदा रद्द केला जात नाही, तोपर्यंत माझी निदर्शने सुरूच राहतील. फक्त तुमची नावे मतदार यादीत आहेत, याची काळजी घ्या. बाकीचे काय करायचे ते मी पाहून घेईन. हा देश कोणालाही सोडावा लागणार नाही,असे त्या म्हणाल्या.