हैदराबाद – तेलंगण विधानसभेतील भाजपच्या सर्व तीन आमदारांना आज विधानसभेतून निलंबित करण्यात आले. आज सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांवर ही कारवाई करण्यात आली. अधिवेशनाच्या उर्वरित कालखंडासाठी या तिन्ही आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
तेलंगणचे र्थमंत्री टी. हरुष राव यांनी आज विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प मांडायला सुरूवात केली. त्यावेळी भाजपचे सदस्य टी. राजा सिंह आणि अन्य सदस्यांनी विधानसभेचे सभापती पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
सिंह यांनी हा प्रयत्न सुरूच ठेवल्यामुळे राज्याचे पशुपालन मंत्री तेलासानी श्रीनिवास यादव यांनी या सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार सभापतींनी बाजपचे आमदार टी. राजा सिंह, एम. रघुनंदन राव आणि इटाला राजेंदर यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करत असल्याची घोषणा केली.
राजा सिंह यांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिल्यामुळे त्यांना बळाचा वापर करून सभागृहातून बाहेर काढण्यात आले. या कारवाईमुळे आपले लोकप्रतिनिधी म्हणून असलेले हक्क डावलण्यात आले असल्याची टीका सिंह यांनी केली आहे.
दरम्यान सभापतींकडून सदस्यांना आपले म्हणणे मांडू दिले जात नसल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर बहिष्कार घातला. सभागृहाचे कामकाज असंवैधानिक पद्धतीने चालवले जात असल्याची टीका कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी केली आहे.