मुंबई – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज समन्स बजाविले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांमागे ईडी लागल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यात आता भाजपच्या आमदाराच्या मागेही नवे चक्र सुरू होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
20 दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद लाड यांच्यावर बीएमसीतील घोटाळ्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहाराचा प्रसाद लाड यांच्यावर आरोप होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड हे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत.
दरम्यान, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून माझे मालाड वेस्टला कोणतेही घर नाही. ही नोटीस सुडबुद्धीने पाठविण्यात आली आहे, असा खुलासा लाड यांनी केला.