नवी दिल्ली : प्रदीर्घ काळापासून भाजपाचे नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कुकर्मांसाठी प्रायश्चित्त करत असल्याचा असा दावा केला आणि स्वतःचे मुंडण करवून घेतले. तसेच त्यांनी कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात यज्ञ केला.
दास यांनी भाजपाने त्रिपुरामध्ये राजकीय अराजकता वाढवल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की लोक राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भूतकाळात ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे. तसेच ममता या पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहे असेही ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून दास यांच्याकडे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचे टीकाकार म्हणून पाहिले जातात.
दास लवकरच तृणमूलमध्ये सामील होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
“आज मी भाजप सरकारच्या कुशासनाचं प्रायश्चित्त म्हणून माझे मुंडण केले आहे. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझे पुढचे पाऊल वेळ ठरवेल”, आशिष दास म्हणाले. दरम्यान, त्रिपुरा भाजपच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार पक्ष दास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल.
कोलकाता येथे माध्यमांशी बोलताना, उत्तर त्रिपुरामधील सुरमा विधानसभा मतदार संघाचे आमदार दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बहुतेक सरकारी मालमत्ता खाजगी पक्षांना विकल्याबद्दल टीका केली.