मुंबई : देशात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या विषयावरून धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना दुसरीकडे उत्तराखंडमधील भाजपाचे माजी आमदार आणि पौरी महानगरपालिकेचे प्रमुख यशपाल बेनाम यांनी मुस्लीम मुलाशी आपल्या मुलीचा विविह ठरवला होता. परंतु ठरवलेला विवाह समाजातून होणाऱ्या विरोधामुळे मोडावा लागला आहे. सध्या या विवाहाची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
भाजपा नेते यशपाल बेनाम यांनी आपल्या मुलीचा विवाह तिच्याबरोबर महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या एका मुस्लीम मुलाशी ठरवला होता. २८ मे रोजी लग्नसोहळा पार पडणार होता. त्याची सर्व तयारी झाली होती. तीन महिन्यांपूर्वीच हे लग्न ठरले होते. या प्रेमविवाहाबाबत त्यांनी सगळ्यांनाच पूर्वकल्पना दिली होती. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही छापून सगळीकडे वाटल्या गेल्या. पण ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागताच या लग्नाची चर्चा वाढली.
काही लोकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. एवढा, की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या झेंड्यांखाली अनेकांनी त्यांच्या घरावर मोर्चाच काढला. यावेळी त्यांच्या नावाने घोषणाबाजी झाली. बेनाम यांना लग्नाच्या विरोधात काही संदेशही येऊ लागले. हा सगळा प्रकार यशपाल बेनाम यांच्यासाठी धक्कादायक होता. विवाहाला किंवा दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनाला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी त्यांनी हा विवाहच सध्या रद्द केला असल्याची माहिती बेनाम यांनी दिली.
“मी एका मुस्लीम मुलाशी माझ्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. सगळ्यांना याची माहिती दिली होती. तेव्हा सगळ्यांनी या लग्नाला होकार दिला होता. हे २१वं शतक आहे. आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याच अधिकार आहे. पण हळूहळू असं वातावरण तयार झालं जे या लग्नासाठी योग्य नव्हतं. त्यामुळे २६ मे ते २८ मे या कालावधीत ठरवण्यात आलेले लग्नाचे सर्व विधी आम्ही रद्द केले आहेत”, अशी प्रतिक्रिया बेनाम यांनी एका इंग्रजी वर्तमानपात्राशी बोलताना दिली.
“एक पिता म्हणून मी माझ्या मुलीच्या प्रेमाला मान्यता दिली. आम्ही त्या मुलाच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली आणि लग्नाला दोन्ही बाजूंनी होकार दिला. पण मीही एक लोकप्रतिनिधी आहे. नगरपालिकेचा प्रमुख आहे. इथल्या लोकांसाठीही माझी काहीतरी जबाबदारी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लग्न रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सामाजिक सलोखा आणि सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहावं यासाठी हा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
“हे लग्न दोन-तीन महिन्यांपूर्वीच ठरलं होतं. तेव्हा मी सगळ्यांना याची माहिती दिली होती. पण नंतर लोक मला सांगायला लागले की तुम्ही निमंत्रण पत्रिकाच छापू नका. पण मी कुणापासूनही काहीही लपवत नव्हतो. ती निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आणि अनेक संघटनांकडून मला इशारे यायला लागले. मला हे लग्न पोलीस संरक्षणात करायचं नव्हतं. मी मुलाच्या कुटुंबीयांचा आभारी आहे की त्यांनी यात आम्हाला सहकार्य केलं”, असे यशपाल बेनाम म्हणाले.
दरम्यान, यशपाल बेनाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातीलही अनेक पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला फोन आल्याचं म्हटलं आहे. “या जगात सर्व प्रकारचे लोक असतात. काही माझ्याशी व्यवस्थित बोलले आणि काहींनी अरेरावीच्या भाषेत संभाषण केलं. पण त्यांच्या मते त्यांचा राग बरोबर होता, जसा माझ्यामते माझं मुलीबद्दलचं प्रेम योग्य आहे. त्या मुलाचे कुटुंबीय खूप चांगले आहेत. ते फक्त मुस्लीम आहेत, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. अनेक लोकांनी मला या लग्नाविरोधात इशारा दिला. ते म्हणाले की यामुळे माझी राजकीय कारकिर्द धोक्यात येईल. पण मी म्हणालो, माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. माझी राजकीय कारकिर्द ही स्वतंत्र बाब आहे”, असे बेनाम म्हणाले.