मुंबई: विधानसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपमधील नेत्यांची नाराजी उघडपणे स्पष्ट झाली आहे. पक्षातील नाराज असलेल्या नेत्यांची दखल पक्षश्रेठींनी घेतली असून यासंदर्भात आज मुंबईत बैठक पार पडली. उद्या नगर जिल्ह्यात बैठक होणार आहे. मुंबईत झालेल्या बैठीकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे आमने सामने-आले. दरम्यान, राम शिंदेनी नगर जिल्ह्यात झालेल्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली. तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला तोटा झाल्याचे म्हटले आहे. बैठकीनंतर ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
यानंतरच माझ्या विरोधातील तक्रारीवर निर्णय घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आजची बैठक सकारात्म झाली असून प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असतेच, त्यामुळे चर्चेतून नक्की मार्ग निघेल असही विखे म्हणाले.
भाजपमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, राम शिंदे हे पक्षात नाराज असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तक्रारींच्या निवारणासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. राम शिंदे यांनी पक्षातल्या काही नेत्यांमुळे आपला पराभव झाल्याचे म्हटले होते. अप्रत्यक्षपणे त्यांनी विखे पाटलांवर आरोप केले होते.
राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते.