- भाजपच्या मनमानीचा कडेलोट
- आमदार, खासदारांनाही डावलले
- देहू संस्थान वादाच्या भोवऱ्यात
- लोकप्रतिनिधींना साधे निमंत्रणही नाही
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 14) पार पडला. हा कार्यक्रम देहू संस्थानचा असतानाही भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदारासह संपूर्ण भाजपनेच हा कार्यक्रम हायजॅक केल्याने देहू संस्थानच्या परंपरेला गालबोट लागल्याची चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या मनमानीमुळे स्थानिक आमदार सुनील शेळके व खासदार श्रीरंग बारणे यांना डावलण्यात आल्याने भाजपच्या मनमानीचा कडेलोट झाल्याने देहू संस्थानही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संत तुकारामांनी दिलेला संदेशच भाजपकडून मोडीत काढण्यात आल्याने ऐन आषाढी वारीच्या तोंडावर वारकरी समाजही दुखावला असतानाच देहू संस्थानकडून धार्मिक कार्यक्रमात राजकारण केल्याचा आरोप उघडपणेही होऊ लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमानिमित्त मंगळवारी (दि. 14) प्रथमच देहूत आले होते. त्यांच्या या दौऱ्याबद्दल नागरिकांसह संपूर्ण वारकरी सांप्रदायामध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यामुळेच या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजशिष्टाचारानुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मारुती महाराज कुऱ्हेकर यांचा समावेश होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले आमदार सुनील शेळके व खासदार श्रीरंग बारणे यांचा उपस्थितांमध्ये समावेश नव्हता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही सुनिल शेळके व खासदार बारणे यांना देण्यात आले नव्हते. निमंत्रण देण्याची जबाबदारी देहू संस्थानची असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचा डावलण्यात आल्याने देहू संस्थानही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आजपर्यंत कोणत्याही वादाची पार्श्वभूमी नसलेल्या देहू संस्थानला भाजपच्या स्थानिक माजी आमदार नामुष्की ओढवून घ्यावी लागल्याने वारकरी सांप्रदायामध्येही नाराजीचे वातावरण पसरले आहे.
शिळा मंदिराची उभारणी ही राज्य शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व देहू संस्थानच्या मदतीने झाली आहे. आजपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून देहू संस्थानला भरघोस निधी देण्यात आला आहे. तरीदेखील केवळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मनमानीला बळी पडून देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला दुजाभाव हा चर्चेचा विषय बनला आहे. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना आपली छबी पुन्हा सुधारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता की काय? इतका त्यांचा हस्तक्षेप या कार्यक्रमात पहावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. देहू संस्थानला भाजपच्या मनमानीचा फटका बसण्याची शक्यता असून इतर राजकीय पक्षांची नाहक नाराजी आषाढी वारीच्या तोंडावर देहू संस्थानला परवडणारी नसल्याचेही बोलले जात आहे.
भाजपकडून कार्यक्रम हायजॅक
भाजपच्या माजी आमदापासून पदाधिकारी, प्रवक्ते व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा या कार्यक्रमामध्ये मोठा वावर होता. हा देहू संस्थानचा कार्यक्रम की भाजपचा प्रचार मेळावा हा प्रश्न उपस्थितांना पडला होता. पंतप्रधान हे देशाचे असतात याचाही विसर पडलेल्या भाजप नेत्यांची मनमानी वारकरी सांप्रदायाची मने दुखावणारी ठरल्याची चर्चा रंगली आहे.
देहू संस्थानने धार्मिक कार्यक्रमात राजकारण केले – खासदार बारणे
याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देहू संस्थानच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मावळ लोकसभा मतदारसंघात धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असतील, तर स्थानिक खासदार म्हणून देहू संस्थानने मला निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, देहू संस्थानने धार्मिक कार्यक्रमात राजकारण करत, मला साधे निमंत्रणदेखील दिले नाही. संस्थान पदाधिकाऱ्यांची ही कृती योग्य नाही.
देहू संस्थानचा कार्यक्रम हा मावळ विधानसभा मतदारसंघात झाला. मी या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्त्व करत आहे. तरीदेखील देहू संस्थानकडून या कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रणच दिले नव्हते. अशा कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना डावलणे योग्य नाही.
सुनिल शेळके, आमदार, मावळ