मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहेत. सरकारकडून बिलंब झाल्याने कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदी अरेबियाची ‘अरामको’ ही कंपनी पाकिस्तानात गेली आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ संघटनेशी संबंधित असून, त्यांना या संघटनेचा पैसा येतो, असा आरोपी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपावर उत्तर देताना शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
यासाठी आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत, “नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, हे वारंवार दिसतंच. त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?” असा सवाल केला आहे.
तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी,“‘पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग’ अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत. उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!,” असा हल्लाबोल भाजपा सरकारवर केला होता.
तर ‘भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे’, आदित्य ठाकरेंच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “किमान आदित्य ठाकरे अभ्यास करून किंवा भाषण ऐकून बोलतील, असं मला वाटत होते. पण, आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधलीय आणि विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय?” असा टोला फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लगावला.