पुणे – गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपने चुकीचे निर्णय घेतले. यामुळे 12 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उत्तरदायित्व वाढले आहे. पुढील काळात स्थायी समितीला आर्थिक तरतुदी, तसेच प्रशासनाला आर्थिक नियोजन करताना मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले. “भाजपने बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि स्वत:चे खिसे भरण्यासाठी मोजक्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवल्या आहेत. यावर लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहोत. भाजपने नदी सुधार योजना, पीपीपी रस्ते, जायका, 23 गावांतील ड्रेनेज लाइन आदी प्रकल्पांत आर्थिक उत्तरदायित्व स्वीकारले आहे.
हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत महापालिकेस निधी देणे बंधनकारक आहे. याचबरोबर महापालिकेच्या सदनिका विक्री, मिळकती भाडे तत्त्वावर देण्यासारख्या चुकीच्या निर्णयामुळे पुढील काळात स्थायी समितीला इतर प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची घरे भरण्यासाठी हे चुकीचे निर्णय घेतले आहे. गेल्या दीड वर्षांत मंजूर झालेल्या निविदांची चौकशी करावी,’ अशी मागणी जगताप यांनी यावेळी केली. दरम्यान, याबाबत भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी या प्रकरणावरून राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.