नवीदिल्ली – भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या निमीत्ताने पुन्हा धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे पण त्यांना या प्रयत्नात यावेळी यश येणार नाही. भाजप सध्या केवळ एकाच गिअरची गाडी चालवत असून तो गाडी मागे नेणारा गिअर आहे अशी टिपण्णी राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी केली आहे.
राष्ट्रीय लोकदल पक्षाने समाजवादी पक्षाशी निवडणूक आघाडी केली असून या पक्षाचा पश्चिमी उत्तरप्रदेशात मोठा प्रभाव आहे. जयंत चौधरी यांनी नमूद केले की आपण यंदा विधानसभेची निवडणूक लढवणार नाही कारण यावेळी आपण फक्त प्रचारावरच लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार आता भाजप सोडून आमच्या आघाडीत सामिल होत आहेत त्यातून आमचाच पर्याय सध्या उत्तरप्रदेशात सर्वात आकर्षक पर्याय आहे असे यातून दिसून येते आहे असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांच्या मतात मोठ्या प्रमाणात फाटाफूट होणार असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले उत्तरप्रदेशात भाजप आघाडी आणि आमची आघाडी यांच्यातच सरळ लढत होणार असल्याने येथे फाटाफूट होण्याची शक्यताच नाही.