लातूर – लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे लातूरमध्ये कॉंग्रसेला आयतेच बळ मिळाले आहे.
19 जागांसाठी लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत काँग्रेस, भाजप व अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद झाले आहेत. अर्जांची छाननी करत असताना त्यात असलेल्या त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्व अर्ज बाद केले.
या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर भाजपने आरोप केले आहेत यामध्ये जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमचे अर्ज बाद कऱण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करून लोकशाहीचा खून केला आहे. या प्रकरणी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत. तसेच सरकारी यंत्रणेच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात आम्ही तक्रारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता ते फोन घेण्यास तयार नव्हते. या प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. हा एक षडयंत्राचा भाग आहे आणि या षडयंत्रात जो कुणी सहभागी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.