नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने दिवंगत नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांना नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून टीका केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता घराणेशाहीबद्दल काही का बोलत नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यावर विजय मिळवण्याच्या क्षमतेच्या आधारावर बांसुरी यांना उमेदवारी दिली गेल्याचा भाजपचा दावा आहे.
बांसुरी यांची उमेदवारी घराणेशाहीचे अत्यंत जिवंत उदाहरण असल्याचे आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री आणि नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांचे तिकिट कापल्याबद्दलही त्यांनी सवाल केला आहे. भारद्वाज म्हणाले की आम्ही सुषमा स्वराज यांचा आदर करतो. मात्र जे अन्य पक्ष त्यांच्या दिवंगत नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देतात ते आदरास पात्र नाहीत का? यावरून समजते की भाजपच्या उक्ती आणि कृतीमध्ये मोठे अंतर आहे.
याला प्रत्युत्तर देताना भाजपचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की दिल्लीतील सातपैकी ज्या पाच जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत ते सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपली योग्यता सिध्द करत लोकप्रियता मिळवली आहे. दिल्ली संघटनेतील २८ सदस्यांपैकी जर एकानेही लेखी यांच्या नावाला समर्थन दिले नाही तर त्याला राष्ट्रीय नेतृत्व काय करेल? तसेच बांसुरी यांच्या नावाला मात्र एकमुखाने समर्थन कसे मिळाले हेही महत्वाचे असल्याचे नमूद करत बांसुरी लोकप्रिय असल्याचे त्यांनी सूचित केले.
ते पुढे म्हणाले की नवी दिल्लीच्या अंतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना बांसुरी यांच्या उपस्थितीसाठी आग्रह धरला जात असतो. आमच्या अंतर्गत सर्वेक्षणातही त्या अत्यंत लोकप्रिय असल्याचे आढळून आले असल्याचे हा नेता म्हणाला. लेखी यांचा खालच्या कार्यकर्त्यांशी तेवढासा संपर्क राहीला नव्हता हे त्यांचे तिकीट कापले जाण्याचे कारण असल्याचेही त्यांनी सूचित केले.