मुंबई – शिवसेनेच्या येथील खासदाराने गद्दारी केली आहे, त्याला तर आडवा करायचा आहे. पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत, ते कुठेही गेले की आपले दुकान चालू करतात. त्यामुळे राजकारणातील दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकाने बंद करायची आहेत.
मी भाजपबाबत याआधीही म्हटले आहे की, अब की बार भाजपाला तडीपार करायचे आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता, असे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
आगामी लोकसभा निवडणुकांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठकाही होताना दिसत आहे. इतकच नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करताना निवडणुकीत जिंकवून देण्याचे आव्हान करताना दिसत आहेत.
पनवेल येथील मावळ याठिकाणी आज जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, देशात पहिली निवडणूक होते अशातील भाग नाही. पण यंदाच्या निवडणुकीत चुकून मोदी सरकार आले, तर ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल.
आजपर्यंत छातीठोकपणे सांगितले होते की, पुन्हा येईन, आज दिल्लीतले लोकही तेच सांगत आहेत, मी पुन्हा येईन, पण पुन्हा येईन म्हणणारे स्वतःच्या घरात जातील. ते परत लोकसभा किंवा विधानसभेत येऊ शकत नाहीत. एवढाच जर पुन्हा येईनचा आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला करता?
असा सवाल करत भाजपला संकटात ज्या पक्षाने साथ दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघाला आहात. इतके नतद्रष्ट राजकारणी या देशात जन्माला आले असतील असे वाटत नाही.
जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते, अशी सडकून टीका त्यांनी केली.