आपलं अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य हे पुण्य पदरात पाडून घेण्याच्याच प्रयत्नात व्यतीत केलं जात असतं. एकही व्यक्ती सापडणार नाही की जी पुण्य प्राप्तीची स्वप्नं बघत नाही. दिवा स्वप्न बघण्याचा प्रत्येकालाच छंद असतो. आपल्या निद्रावस्थेत देखील आपण स्वप्नावस्थेची अनुभूती घेत असतो. झोपेत बघितलेली स्वप्नं आपल्याला जागेपणी आठवतातच असं नाही, तसंच जागेपणी बघितलेली स्वप्नं देखील झोपेत दिसत, आठवत नाहीत. झोपेतील स्वप्न साकार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण जाग आल्यावर ती आठवतच नाहीत; पण जागेपणी बघितलेलं प्रत्येक स्वप्नं साकारणे, त्यांना सत्यात उतरविणे शक्य होऊ शकतं. स्वप्नावस्था आपल्या अंतर्मनाशी निगडित असते. ज्या गोष्टी अंतर्मनाला स्पर्श करतात, त्या नेमकेपणाची प्रचिती देत असतात. आपल्याला त्या स्वप्नावस्थेत दृष्टांत देत असतात.
आपल्या अंतर्मनात येणारे पुण्याचे विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असतो. तसं करण्यामुळे आपल्या मनात साठून राहिलेल्या आपल्याला अपेक्षित पुण्याच्या गोष्टी बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. निसर्ग नियमानुसार ते गरजेचं असतं. आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणानं मनातील पुण्याचे विषय एखाद्याला सांगितले की मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचं देखील जाणवतं. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचं निराकरण होत जातं, पुण्य आपल्या पदरी कसं पडेल हेही कळत जातं. काहीवेळा उद्भवलेल्या प्रश्नांची उकल होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीनं मोकळेपणानं आपल्या मनांतील शंका व्यक्त करणं उपयुक्त ठरतं. आपल्याला पुण्याशी संबंधित पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम आणि संभ्रमामुळे निर्माण होत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सारखी नसतात, प्रत्येकाचे पुण्यप्राप्तीचे प्रश्न निराळे असतात, उत्तरेही प्रत्येकासाठी भिन्न असतात.
पुण्याई म्हणजे नक्की काय?
दैनंदिन आयुष्यात स्वतःच्या अशा कितीतरी प्रकारच्या, आपलं जीवन जगण्याच्या, नवनवीन कल्पना आपल्या मनात येत असतात. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपलं आयुष्य इतरांपेक्षा निराळं असावं, जगानं कौतुक करावं असंच आपलं जीवन असावं, आपल्या प्रत्येक बाबतीत काही-ना-काही वेगळेपण असावं. इतरांपेक्षा मी, माझी प्रत्येक गोष्ट भिन्न असण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यासाठी बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करावा लागत असल्याची जाणीव होणं आवश्यक असतं. त्या वेगळेपणातच आपल्याला पुण्याईचं दर्शन घडत असतं, तशी प्रचिती येत असते. माणसानं, माणसाशी, माणसासमं वागण्यानंच ह्या पुण्याईची प्राप्ती होत असते. आपलं आयुष्य आपल्याला काहीवेळा एकदम सहज हसण्याची संधी देतं. काय असावं त्या मागचं कारण? कारण हे असावं की, आपल्या नकळत आपलंच कुणीतरी आपल्यासाठीच देवाकडे काहीतरी मागतंय. हे आपलंच कुणीतरी कधीकधी आपल्या सोबत, आपल्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेनं, मनानं नेहमी आपल्याकडेच असतं, ते कुणीतरी आपलं माणूस आहे, हेही कळणे कठीण असतं; कारण ते कुणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी आपल्याला काहीतरी देतं, तेव्हा त्या आपल्याच कुणीतरीचे मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे असतात. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणीतरीच्या रांगेत उभं राहायचं असतं. कारण दुसऱ्यांसाठी मागितलेलं परमेश्वर पटकन देत असतो, पूर्ण करतो, असं म्हणतात. कुणीतरीच्या यादीत जेव्हा आपण एखादं नाव प्राधान्यक्रमानं घेत असतो तेव्हा जे काही आपल्याला प्राप्त होतं, तिलाच पुण्याई म्हटलं जात असतं. आपण स्वतःसाठी नेहमीच काही-ना-काही तरी मागतच असतो, जेव्हा दुसऱ्यासाठी आपण काही मागतो तेव्हा खरं पुण्य आपल्या पदरात पडत असल्याची जाणीव ठेवणं जरुरीचं असतं.
पुण्याची गणना कोण करी?
सद्य:स्थितीत अनेकदा साधेपणा म्हणजे भोळेपणा अथवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिक विचारसरणी, काही प्रमाणात अंधानुकरण ह्यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असल्याचं आपण सर्वचजण अनुभवत आहोत. एका अर्थी हे होणारे बदल आपला विकासच घडवत असतात. आपलं केवळ नीटनेटकं राहणं हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळं, आकर्षक दिसणं आवश्यक झालं आहे. त्यामुळे आहे त्यात आपल्याला खरंच समाधान मिळत आहे का? आपण प्राप्त परिस्थितीत सुख-समाधान मिळवू शकत आहोत का? अशा स्वरूपाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांमुळेच आपण दु:खी होत राहतो, कशातच समाधान मिळत नाही, असं म्हणत आपलं दु:ख मिरवत राहतो. मुळातच सुंदर असणं, आकर्षक दिसणं ह्या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या, तरीही केवळ आकर्षक दिसणं महत्त्वाचं नसून सुंदर असणं जरुरीचं असतं. त्यामुळेच सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असण्याकडे आपला कल असणं गरजेचं असतं. आपण सुंदर असण्यासाठी आपले विचार, वर्तन आणि व्यवहार देखील सुंदर असणं महत्त्वाचं असतं. ह्या तीनही बाबी जेव्हा सुंदर असतात तेव्हाच आपली गणना पुण्यवंतांच्या यादीत केली जाऊ लागते. आजही पुण्याची गणना करणाऱ्या अनेक व्यक्ती जगात आहेत, ज्यांच्याकडून आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहाराचं मूल्यांकन, मूल्यमापन केलं जात असतं. पुण्याची गणना करणाऱ्यांची जाणीव आपल्याला असणं, ती सतत होणं महत्त्वाचं असतं.
जयंती-पुण्यतिथी कशासाठी करायची?
ज्याचा उगम होतो त्याचा अस्त देखील होतोच, हा सृष्टीचा विधिलिखित नियम आहे. तसंच ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याला कधी-ना-कधी मृत्यू येतोच. जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कर्म, कार्य, कृती, विचार, वर्तन, व्यवहार, व्यक्तिमत्त्व सर्वच निराळं असतं. ह्या निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वांच्या वैविध्यपूर्ण गुणसमुच्चयाच्या माध्यमातून सकारात्मक वैचारिक मंथन घडून येण्यासाठी त्याचं स्मरण होत राहणं जरुरीचं असतं. सामाजिक परिवर्तन, प्रगती, उन्नती ह्या दृष्टिकोनातून त्याच्या वैचारिक बैठकीचं महात्म्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं जरुरीचं असतं. जयंती-पुण्यतिथीनिमित्त केवळ संबंधितांच्या फोटोंना, पुतळ्यांना हार घालून, मोठमोठे मंडप घालून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून, वस्तूंचं मोफत वाटप करून, ध्वनी प्रदूषण होत असल्याची कोणतीही जाणीव न होता मोठ-मोठ्या आवाजात गाणी वाजवून कार्यक्रमांवर वारेमाप उधळपट्टी करून कोणतंही पुण्य पदरात पडत नसतं, ह्याची जाणीव न होणं हीच उणीव असणारे संख्येनं दिवसेंदिवस खूपच वाढत चालले असल्याचं दिसून येत आहे. मूळ उद्दिष्ट साध्य न होता केवळ शक्तिप्रदर्शन करण्यात धन्यता मानणारे, केवळ स्वतःच्या प्रसिद्धीला हपापलेल्या अनेकांना अशा कार्यक्रमाचा इव्हेंट करण्यातच स्वारस्य असतं. ह्यामध्ये हपापाचा माल गपापा होत असल्याची देखील जाणीव होऊ शकत नाही, हाच कळीचा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीची जयंती साजरी करण्यात त्या व्यक्तीचं स्मरण करणं हा जसा उद्देश असतो तसंच त्या व्यक्तीचे गुणविशेष आपल्या अंगी बाळगण्याचे एक चांगलं निमित्त त्यामाध्यमातून आपल्याला मिळत असतं.
पुण्य देणारी जयंती कोणती?
पुण्य पदरात पडू देणारी जयंती ही अनेकांसाठी पुण्यतिथीच असते, पण पुण्यतिथीपेक्षा जयंतीचं महत्त्व अधिक असल्याची अनुभूती जयंती साजऱ्या करणाऱ्या भक्तांना येत असते. नेत्यांच्या जयंतीच्या उत्सवातील पदरात पडणाऱ्या पुण्याची तर गणना आणि गणती दोन्हीही होऊ शकत नसतं. राजकीय नेत्यांच्या जयंतीच्या निमित्तानं साजऱ्या होणाऱ्या अनेक इव्हेंट्सना खूप मोठ्या प्रमाणांत प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत असतं. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या जयंतीच्या उत्सवाचं महत्त्व अबाधित राहात असतं. ह्या प्रकारचे उत्सव साजरे करणाऱ्यांना आर्थिक पातळीवर मिळणारं पुण्य तर, ते किती प्राप्त झालं, हे गणितीय पद्धतीने समीकरणे मांडून देखील उलगडत नाही. त्यामुळे देवादिकांच्या जयंतीच्या कार्यक्रमापेक्षा राजकीय नेत्यांच्या जयंती उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसून येतं. जयंती उत्सव हा अधिकतर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साजरा करण्याची प्रचलित प्रथा असल्याचं कळतं. एखाद्या व्यक्तीच्या पश्चात जयंती उत्सव जितक्या उत्साहानं साजरा होऊ लागतो, तितक्याच उत्साहात त्या व्यक्तीच्या हयातीत वाढदिवस साजरा करावा असं का वाटत नाही? व्यक्तीचं महत्त्व तिच्या निधनानंतर कळायला लागतं का? की त्या व्यक्तीच्या वाढदिवसाचं पुण्य अपेक्षेपेक्षाही कमी पदरात पडत असतं? हाच कळीचा मुद्दा आहे. जयंती म्हणजे जन्मदिवसच ना? मग त्या व्यक्तीच्या जिवंतपणी जन्मदिवस साजरा करण्याच्या ऐवजी निधनानंतर जयंती साजरी करण्यात असं नेमकं काय महात्म्य सामावलेलं असू शकतं?
अनेक वर्षांनंतर देखील आपल्याकडे एखाद्या महात्म्याची जयंती कधी साजरी करायची ह्यावर संभ्रम, मतभिन्नता आहे, त्यावरून सतत वाद होतात. अर्थात, जयंती साजरी करण्याचा दिवस निश्चितच महत्त्वाचा असल्याचं मानला पाहिजे; परंतु त्या महात्म्याच्या अंगी असणाऱ्या एखाद्या तरी गुणाला अंगीकारण्याचा विचार, प्रयत्न होताना दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. ह्या खरं तर उणिवाच म्हणाव्या लागतील. स्त्रियांना माता-भगिनी समान मानणाऱ्या महात्म्याच्या जयंतीनिमित्त अशी कोणी शपथ घेतं का, कृती करतं का, की स्त्रियांना माता-भगिनी समान वागणूक देण्याची सुरुवात माझ्यापासूनच होईल. आपण अशा गुणांना अंगीकारू शकत नसल्यामुळे त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा आपला हक्कही नाही. केवळ आर्थिक पातळीवर पुण्य देणारी जयंती साजरी करणं हे संधिसाधू असल्याचं लक्षण मानावं लागेल. असा संधिसाधूपणा करणाऱ्यांना त्याच्यांतील उणिवांची जाणीव करून द्यावी लागेल. पुण्य ही काही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही, ह्याचीही जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. पुण्य देणारी जयंती आर्थिक पातळीवर साजरी करणं म्हणजे स्वतःमधील उणिवांचं प्रदर्शन मांडण्यासारखंच असतं.
प्रा. शैलेश कुलकर्णी