पटना – विधानसभा निवडणुक जवळ आल्याने बिहारमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुक जवळ आली असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जेडीयूने मोठा निर्णय घेतला आहे.
नितीशकुमार यांच्या पक्षाने 15 नेत्यांची पुढील सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. एनडीए विरूद्ध निवडणुक मैदानात उतरल्यामुळे त्या नेत्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
जडीयूने दिलेल्या माहितीनुसार, पक्षातून काढून टाकलेल्या नेत्यांमध्ये डुमरांव येथील अपक्ष निवडणूक लढविणारे आमदार दादन पैलवान, सिकंदराचे माजी मंत्री रामेश्वर पासवान, जगदीशपुर येथील लोजपाचे उमेदवार भगवानसिंग कुशवाह, माजी आमदार रणविजय, चकईचे अपक्ष उमेदवार सुमितकुमार सिंग यांचा समावेश आहे.
याशिवाय महिला जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष कंचन गुप्ता, युवा जेडीयू नेते तज्मूल खान, रोहतासचे माजी जिल्हाध्यक्ष अमरेश चौधरी, जेडीयू नेते सिंधू चौधरी, डाॅ. राकेश रंजन, मुंगेरी पासवान यांचा समावेश आहे. तसेच ददन पैलवान यांचा मुलगा करतारसिंग यादव यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.