नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. रुग्णालयं भरली असून ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहेत. त्यातच करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील टास्क फोर्सचे प्रमुख तात्याराव लहाने यांनी करोनाच्या लाटांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच मत व्यक्त केलं होतं. आता ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊनसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारताला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन याचा काहीच फायदा नाही, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलं.
करोना महामारी अशीच वाढत राहिली आणि इम्यून एस्केप मॅकेनिझ्म विकसित करण्यात यशस्वी झाल्यास भारताला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. तसेच करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पर्याप्त कालावधीसाठी लॉकडाऊन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवून आणणे, करोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि लसीकरणाची मोहीम गतीमान करणे यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. करोनाची साखळी तोडावी लागणार असून क्लोज कॅन्टॅकेट कमी करण्यात यश आलं तरी देशातील करोना रुग्णांची संख्या कमी होईल, असं गुलेरिया यांनी सांगितलं.