नवी दिल्ली – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि कन्या मिसा भारती यांना बुधवारी दिल्लीतील न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला.
लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेला सीबीआयने विरोध दर्शवला नाही. लालू रेल्वेमंत्री असताना घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
रेल्वेत अनियमित नियुक्त्या करण्यात आल्या. नोकरीच्या बदल्यात लालूंच्या कुटूंबीयांना भेट म्हणून किंवा विक्रीतून जमिनी देण्यात आल्या. जमिनींची विक्री अतिशय कमी किमतीत करण्यात आली, असे सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी आता 29 मार्चला होईल.