पुणे :- सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत शनिवारी(दि.२) स्पष्ट केले.
खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.
पवना व चासकमान मध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही, असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी…
नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 4 टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा 91 टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.