नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभेचा हक्कभंग केला या कारणावरून रिपलब्लीक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला मज्जाव केला आहे. या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी विधीमंडळ सचिवांनी जी नोटीस बजावली आहे ती नोटीस सर्वोच्च न्यायालयात सादर न करण्याचा इशारा दिला होता.
त्या प्रकरणात आपल्यावर न्यायालयाची बेअदबी केल्याची कारवाई का करू नये अशी विचारणा करणारी नोटीसही सर्वोच्च न्यायलयाने विधीमंडळ सचिवांना जारी केली आहे. दोन आठवड्यांच्या आत यावर उत्तर देण्याची सूचना महाराष्ट्र विधीमंडळ सचिवांना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळ सचिवांनी आरोपीला न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास मज्जाव करणे म्हणजे न्याय व्यवस्थेतच ढवळाढवळ करण्याचा प्रकार असून त्यात आरोपीला धमकीही देण्याचा प्रकार घडल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे.
सुशांतसिंह प्रकरणात रिपब्लीक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र विधीमंडळ सचिवांनी हक्कभंगाच्या संबंधात नोटीस जारी केली आहे. त्या नोटीशीला अर्णव यांनी सुप्रिम कोर्टात आव्हान दिले आहे.