नवी दिल्ली – राजकारणात पक्षबदल ही आता नियमितपणे घडणारी प्रक्रिया बनली आहे. मागील सात वर्षांत घडलेल्या त्या प्रक्रियेचा सर्वांधिक राजकीय फटका कॉंग्रेसला बसला आहे. त्याउलट, भाजपला मोठा राजकीय लाभ झाला आहे. भाजपने 2014 मध्ये केंद्राची सत्ता मिळवली.
तेव्हापासून सात वर्षांत झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळच्या पक्षबदलाचा अभ्यास नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थांनी केला. त्या संस्थांनी पक्ष बदलून निवडणुका लढवलेल्या 1 हजार 133 उमेदवार आणि 500 आमदार-खासदारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची छाननी करून अहवाल बनवला. त्या अहवालानुसार, 222 उमेदवारांनी आणि 177 आमदार-खासदारांनी निवडणुकांच्या काळात कॉंग्रेसचा हात सोडून इतर पक्षांत प्रवेश केला.
म्हणजेच, कॉंग्रेसने निवडणूक रिंगणात उतरलेले 399 उमेदवार गमावले. संबंधित कालावधीत 111 उमेदवार आणि 33 आमदार-खासदारांनी भाजपला रामराम ठोकला. मात्र, त्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक इनकमिंग भाजपमध्ये झाले. इतर पक्षांतून 253 उमेदवार आणि 173 आमदार-खासदार भाजपमध्ये डेरेदाखल झाले. कॉंग्रेसमध्ये इतर पक्षांतून 115 उमेदवार आणि 61 आमदार-खासदारांनी प्रवेश केला.
कॉंग्रेसखालोखाल पक्षबदलामुळे बहुजन समाज पक्षाचे (बसप) मोठे नुकसान झाले. त्या पक्षातून 153 उमेदवार आणि 20 आमदार-खासदार बाहेर पडले. तर, इतर पक्षांतून 65 उमेदवार आणि 12 आमदार-खासदारांचे बसपमध्ये आगमन झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या 31 उमेदवारांनी आणि 26 आमदार-खासदारांनी इतर पक्षांत प्रवेश केला. तृणमूलमध्ये इतर पक्षांच्या 23 उमेदवारांनी आणि 31 आमदार-खासदारांनी प्रवेश केला. त्यामुळे तृणमूलसाठी आयाराम आणि गयारामांची संख्या जवळपास सारखीच ठरली.