मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे.ठाकरे गटाच्या 14 आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले असल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 40 आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. यासंदर्भात त्यांना उत्तर दाखल करायचे होते, तसे पत्र विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले होते. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती.
काय निर्णय घेणार?
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि राज्यात राजकीय सत्तासंघर्ष उद्भवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे.
त्यामुळे आता शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेले ते आमदार पात्र की, अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. कोणाचे आमदार पात्र आणि कोणाचे आमदार अपात्र? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे तर आहेच, मात्र कोणाचा गट हा खरा पक्ष आहे? हे ठरवण्याचे अधिकार देखील नार्वेकरांनाच आहेत.