मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र काँग्रेसमध्ये अजूनही मतभेत सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसमध्ये नुकतेच मुंबईचे शहर अध्यक्षपद बदलण्यात आले आहे. भाई जगताप यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष ही बदलण्याबाबत काँग्रेसमध्ये हालचाल सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीत जाणार आहे.
थोरात यांच्याकडे महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ गट नेते तसच प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे कदाचित थोरात प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
बाळासाहेब थोरात आज दिल्लीत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसमवेत याबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्याआधी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली आहे. मात्र, चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.
विशेष म्हणजे, बाळासाहेब थोरात यांनी मागील काही काळात रोखठोक भूमिका मांडल्यामुळे ते चर्चेच्या स्थानी होते. काँग्रेसच्या आमदारांना निधी असो अथवा मंत्रिमंडळात काम करण्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर अलीकडे औरंगाबाद शहराच्या नामकरणालाही थोरात यांनी विरोध केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह निर्माण झाली होती.