मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे. त्यामुळे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे.
दरम्यान, औरंगाबादचे नामकरण “संभाजीनगर’ असे करण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याने आणि त्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाल्याने नामांतराच्या या विषयावरून मतांतरे दिसू लागली आहेत. मात्र याबाबतही महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं सांगितलं आहे.