पिंपरी – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडकरांनी आज मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला. संत तुकाराम महाराजांची पालखी तीर्थक्षेत्र देहूतून रविवारीच शहरात दाखल झाली होती. रात्रीचा मुक्काम आणि सकाळचा विसावा घेतल्यानंतर ही पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तीर्थक्षेत्र आळंदी येथून सोमवारी सकाळी शहरात दाखल झाली. सकाळची आरती शहरातील वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मदिरात आरती झाल्यानंतर या पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला.
ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि.12) पहाटे आकुर्डी येथून पुण्याकडे मार्गस्थ झाला. दापोडी येथील पुलापर्यंत चालत जाऊन पिंपरी-चिंचवडकरांनी पालखीला निरोप दिला.
रविवारी शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले होते. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा रात्री मुक्काम होता. पहाटे पालिका आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांच्या हस्ते पादुकांचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उपायुक्त रविकिरण घोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, शीतल वाकडे, अमित पंडित, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे गोपाळ कुटे, देहू संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळा आकुर्डीतील खंडोबामाळ चौक मार्गे फिनोलेक्स चौक ते खराळवाडी येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा पालखी सोहळा खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात विसावला. सकाळी नऊच्या सुमारास पुढे मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी दापोडी येथे थांबला. दुपारी दोननंतर या पालखी सोहळ्याने पुण्याच्या हद्दीत प्रवेश केला. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत दर्शन घेतले व पालखीवर फुलांची उधळण केली.