मंगळवारपासून फळे-भाजीपाला विभाग सुरू
पुणे(प्रतिनिधी) – सहा दिवसानंतर मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग सोमवारपासून ( आज दि. 20) सुरू झाला आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी नागरिकांनी, दुकानदारांनी अन्नधान्य आणि किराणा मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. त्यामुळे भुसार बाजारात फारशी गर्दी नव्हती. उद्यापासून (दि. 21) फळे-भाजीपाला विभाग सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील भाजीपाला पुरवठा पुन्हा सुरळीत होवून, किरकोळ बाजारात भाज्यांचे वाढलेले भाव कमी होतील.
वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या कडक लॉकडाऊनमुळे सहा दिवसांपासून मार्केट यार्ड पूर्णपणे बंद होते. त्यानंतर आज भुसार बाजार सुरू झाला. अपेक्षेप्रमाणे बाजारात गर्दी झाली नसून, सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत भुसार विभाग सुरू होता. दरम्यान भुसार बाजारात सोमवारी 116 गाड्यांची आवक झाल्याची माहिती भुसार विभागप्रमुख नितीन रासकर यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात सुमारे 50 ते 60 गाड्या आवक होत होती. त्या तुलनेत आज जास्त आवक झाल्याचे पाहायला मिळाले. लॉकडऊन सुरू असेपर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेतच मार्केट यार्डातील सर्व विभागाचे व्यवहार होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी रात्री बाजारात माल आणता येणार आहे.