गाझीयाबाद – भारतीय किसान युनियनने गाझीपुर-गाझियाबाद येथील आंदोलन स्थळी आंदोलन काळात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले असून त्याचे भूमिपुजन व पायाभरणी समारंभ काल करण्यात आला.
या लढ्यात आत्तापर्यंत 320 शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या गावांत जाऊन तेथील माती या स्मारकासाठी आणण्यात आली आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी याचे भूमीपुजन करण्यात आले. या स्मारकाचे नंतर कायम स्वरूपी स्मारकात रूपांतर केले जाणार आहे असे भारतीय किसान युनियनचे प्रसिद्धी प्रमुख धर्मेंद्र मलिक यांनी पीटीआयला सांगितले.
तथापि शेतकऱ्यांनी तेथे केलेला हा पायाभरणी समारंभ केवळ औपचारीक व प्रतिकात्मक स्वरूपात आहे, तेथे कायम स्वरूपी स्मारक उभारले जाणार नाही असे गाझीयाबादचे जिल्हाधिकारी अजय शंकर पांडे यांनी सांगितले. 50 शेतकऱ्यांनी मिट्टी सत्याग्रह यात्रा काढून मृत शेतकऱ्यांच्या गावातून ही माती दिल्ली सीमेवर आणली आहे.