मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 25 एप्रिलला मुंबईतील सीबीआय मुख्य कार्यालयाला पत्र पाठवून भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिगचा आरोप केला होता. या प्रकरणाचा लेखी अहवाल आता चौकशी समितीकडून देण्यात आला आहे. चौकशी समितीच्या लेखी अहवालानंतर आता आमदार राहुल कुल यांना भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्यात राज्य शासनाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आजच्या कामकाजाच्या तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीमध्ये राहुल कुल यांना या साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्यामध्ये क्लिन चीट देण्यात आल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
चौकशी समितीने दिलेल्या लेखी अहवालानुसार, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 अखेरच्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.
त्याचप्रमाणे सन 2022-23 चा लेखापरिक्षण अहवाल अद्याप पूर्ण झालेला नसून ज्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये राहुल कुल यांनी कोणताही घोटाळा केला नसल्याचेच दिसून येत आहे. तर या प्रकरणाची पुढील कारवाई अद्यापही सुरू आहे. त्यामुळे राहुल कुल यांना सध्या दोषी ठरवण्याचा प्रश्न येत नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
“फडणवीस यांना स्वतःचे लोकांना वाचवायचे माहिती आहे. तसेच इतर पक्षाच्या लोकांना धुवून काढायचे. ते स्वच्छ होत नाही. पण त्यांच्यावर रंग सफेदी करायची. क्लीन चिट द्यायची हा या सरकारचा उद्योग आहे. महाराष्ट्रातील उद्योग जरी कमी झाले असले तरी हा उद्योग जोरात सुरू आहे.’
– खासदार संजय राऊत, ठाकरे गट
“माझयावरील सर्व आरोप राजकीय होते, यात काहीच तथ्य नव्हते. मी आरोप झाल्यावर तीनच दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले होते. अशा चौकशा याआधी झाल्या आहेत. त्यामध्ये तथ्य नाही. या चौकशीतून काही बाहेर आले नाही आणि यापुढेही काही बाहेर येणार नाही. उलट आरोप झाल्यावर माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निषेधाचा मोर्चा काढला.”
– राहुल कुल, आमदार