“डिजिटल प्रभात’ प्रभाव
पुणे – 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी नाशिक येथे होणार आहे. या संमेलनासाठी बदललेया पद्धतीनुसार 20 जणांची समिती अध्यक्षांची निवड करणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या सर्व घटकसंस्थांनी संभाव्य संमेलनाध्यक्षांची नावे सुचवली आहेत.
सदर यादीमध्ये कथाकार भारत सासणे यांच्यासह बेंगळुरू येथील कथा-कादंबरीकार सानिया अर्थात सुनंदा कुलकर्णी-बलरामन यांच्या नावांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, सासणे आणि सानिया यांच्या नावांना “डिजिटल प्रभात’ने घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये पसंती मिळाली होती.
संमेलनाध्यक्षांची अन्य नावे आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल अवचट, भारत सासणे यांच्यासह अन्य साहित्यिक आहेत. साहित्य क्षेत्रातील मातृसंस्था म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेसह, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद (यांच्याकडेच सध्या साहित्य महामंडळाची सूत्रे आहेत.) तसेच महाराष्ट्राबाहेरील साहित्य संस्था यांच्या प्रतिनिधींनी ही नावे पाठवली आहेत.
आता या नावांवर साधक-बाधक विचार होऊन, सर्वसंमतीने अथवा गुप्त मतदान पद्धतीने नव्या अध्यक्षांची निवड जाहीर केली जाईल. तसेच संमेलनाच्या तारखा आणि नाशिकमधील संमेलनस्थळाविषयी निर्णय घेतले जातील, असे साहित्य महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले आहे.