कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार, भट्टाचार्य आज पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश करतील.
तत्पूर्वी, २०१६ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या अरिंदम भट्टाचार्य यांनी पुढे तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ते पुन्हा एकदा पक्षांतर करीत आहेत.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत तृणमूलचे अर्ध्या डझनाहून अधिक नेत्यांनीही कमळ हाती घेतले होते.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाचे प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आपण नंदीग्राम येथून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारी यांचा मतदारसंघ असून ममता यांनी येथून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. ममतांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर सुवेंदू यांनी देखील, ‘ममतांना नंदीग्राममध्ये पराभूत न केल्यास राजकारण सोडून देऊ’ असे प्रतिआव्हान दिले आहे.