नवी दिल्ली – पुढच्या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. अरूणाचल प्रदेशपासून गुजरातपर्यंत या यात्रेचा मार्ग असणार आहे. गुरूवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या भागाचा उल्लेख केला.
एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला कार्यकारीणीसमोर मांडायची आहे. गेल्या काही काळापासून पक्षाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते माझ्याकडे सातत्याने एक मागणी करत आहेत की राहुल गांधी यांना देशाचा पूर्व भाग ते पश्चिम भाग अशी भारत जोडो यात्रा करण्याची मी विनंती करावी. आता कार्यकारीणीत मी राहुल गांधी यांच्या समोरच हा विषय मांडत असून निर्णय तुमच्यावर सोपवतो आहे असे खर्गे यावेळी म्हणाले.
१२ सप्टेंबर रोजी राहुल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती. देशाच्या १२ राज्यांतून प्रवास करत ही यात्रा जम्मू काश्मीरमध्ये समाप्त झाली होती. १३६ दिवसांच्या या यात्रेत चार हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी कापण्यात आले होते. सगळ्यांनी एकत्र येत भारत आणखी बलशाली करणे हा यात्रेचा उद्देश होता असे कॉंग्रेसचे म्हणणे होते. यात्रेच्या काळात राहुल गांधी यांच्या अनेक सभा झाल्या होत्या आणि त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर जोरदार टीका केली होती.
दरम्यान, राहुल यांच्या भारत जोडोच्या धर्तीवरच कॉंग्रेसने २० तारखेपासून उत्तर प्रदेश जोडो यात्रा सुरू केली आहे. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी शाकंभरी देवीची पूजा केल्यानंतर सहारनपूर येथून यात्रा सुरू केली आहे.