नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जेबकतरा (पाकिटमार) हा शब्द राहुल गांधी यांनी राजस्थानातील प्रचारसभेत वापरला होता. त्याबद्दल त्यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत असे न्यायालयाने म्हटले आहत. तसेच निवडणूक आयोगाने याबाबत आठ दिवसांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल यांनी मोदींच्या संदर्भात जेबकतरा आणि पनौती या दोन असंसदीय शब्दांचा प्रयोग केला होता.
२२ नोव्हेंबर रोजी केलेल्या भाषणात राहुल म्हणाले होते की पीएमचा अर्थ आहे पनौती मोदी. मोदी टीव्हीवर येतात आणि हिंदू- मुस्लिम करतात. कधी कधी ते क्रिकेटची मॅच बघायलाही जातात. अर्थात हरवून येतात ती वेगळी गोष्ट. तुमचे लक्ष विचलीत करणे हे त्यांचे काम आहे. असेच दोन पाकीटमार असतात. एक येतो, तुमच्यासमोर येऊन तुमच्याशी बोलतो, तुमचे लक्ष विचलीत करतो. तोपर्यंत दुसरा कोणीतरी येऊन तुमचे पाकीट मारतो.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मोदी यांनी स्टेडीयमवर हजेरी लावली होती. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला. त्या पाश्र्वभूमीवर राहुल यांनी हे वक्तव्य केले होते. भारत नागर नावाच्या व्यक्तीने या विरोधात याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसह उच्च पदांवरील व्यक्तींवर गंभीर आरोप आपल्या भाषणात केले असल्याचे आणि त्यांना पाकीटमारही म्हटल्याचे आपल्या याचिकेत म्हटले होते.
राहुल यांनी जेंव्हा ते विधान केले होते तेंव्हा भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली होती आणि त्यांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते. आयोगानेही राहुल यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आता न्यायालयाने याच विषयात आठ दिवसांत निर्णय घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला केली आहे.