भोर -भोर, वेल्हे तालुक्यांच्या सीमा बंद केल्या असतानाही रात्रीच्या वेळी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून पोलिसांची नजर चुकवून व चेक नाक्यावरी काहीतरी खोटेनाटे बहाणे करून भोरमध्ये येणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोनाचा धोका आणखी वाढला असल्याने आता भोरमध्ये बाहेरगावरून जे येतील त्यांना थेट 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.
भोरमधील राजगड ज्ञानपीठ संचलीत मुलांचे व मुलींची, पुणे सातारा महामार्गावरील सह्याद्री अभियांत्रिकी आणि हारतळी येथील अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतीगृह अशी एकूण चार वसतीगृह ताब्यात घेतली आहेत. करोना विषाणुच्या प्रसार काळात बाहेर गांवाहून येणाऱ्या सुमारे 1 हजार लोकांना 14 दिवस क्वारंटाइन करता येणार आहे, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
भोर तालुक्यातील नेरे येथे दि. 14 एप्रिल रोजी मुंबईवरुन आलेला एक रुग्ण करोनाबाधित आढळला होता. तर त्याच गावातील त्याच्या संपर्कात आलेला त्याच्या चुलत भावाच्या एका 17 वर्षीय मुलीला करोनाची लागण झाल्याने भोरचे प्रशासन हादरुन गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वत्र लॉकडाऊनची कारवाई कडक केली असतानाही भोरमध्ये बाहेरगांवाहून येणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याने करोनाचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आजित पाटील व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी हा निर्णय घेतला आहे.