मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर व निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. गेल्या वर्षी विश्वकरंडक स्पर्धेसाठी झालेल्या संघनिवडीवरून हे दोघेही आक्रमक झाले होते, अखेर माजी कसोटीपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या संघात चौथ्या क्रमांकावर विजय शंकर या खेळाडूची निवड का करण्यात आली अशी विचारणा गंभीरने या चर्चेत केली. अंबाती रायडूसारख्या अनुभवी भरात असलेल्या खेळाडूला न निवडता शंकरची निवड करण्यात आली होती. केवळ पाच आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव असूनही शंकरची निवड कोणत्या निकषांवर झाली, अशी विचारणाही गंभीरने केली. युवराज सिंग, सुरेश रैना, रायडू आणि मलादेखील त्यावेळी प्रसाद यांनी काहीही कल्पना का दिली नाही, असा सवालही गंभीरने विचारला.
यावर प्रसाद देखील आक्रमक झाले. शंकरची देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी चांगली होती. तसेच तो गोलंदाजीदेखील करू शकतो याच निकषावर त्याला निवडण्यात आल्याचे स्पष्ट केले. या वादात उडी घेत दोघांनाही शांत करताना श्रीकांत यांनी दोघांचेही वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले.