उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचं ऊन तळपत होतं. येणारा वारासुद्धा सूर्यावरून आल्यासारखा तापलेला होता. अंग भाजून काढत होता. अंगाची लाही होत होती. सावलीशिवाय मनाला गारवा मिळणार नव्हता. मी शहरात वाढलो होतो. पण सगळं सोसायची तयारी असायची. उन्हा-तान्हाला, थंडी-वाऱ्याला न जुमानता मी काम करत राहायचो. पण आज जरा जास्तच तापलेलं होतं. पाखरूसुद्धा पंख मारताना दिसत नव्हतं. दोन-चार कासऱ्यावर चुलती, चुलत भाऊ, त्याची बायको मातीच्या अंथरुणावर, सावली पांघरून आडवे झालेले होते. मी पुण्याहून दोनचार दिवसांसाठी गावी यायचो. “चार दिवस ऊन वारा सोसल्याने माणूस मरत नाही.’ अशी माझी भावना होती. त्यामुळे कसलीही पर्वा न करता मी ऊन-वारा झेलत राहायचो, पण आजच्या उन्हापुढे मला हार मानवी लागली.
आंब्याचा गारवा जवळ करावासा वाटला. नुसतं “सावलीत जायचं’ या विचारानेही मन गार झालं. आंब्याखाली गेलो. आडवा झालो. आंब्याच्या पानातून फक्त सावली निथळत होती. सावलीचा रंग काळा होता. पण कर्म मात्र धुतल्या तांदळाहून स्वच्छ होतं. सावली तिच्या आसऱ्याला येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाला गारवा द्यायची, पुण्य गाठीला बांधायची. झाडाच्या आश्रयाला आलेला जीव सावलीत येऊन गार व्हायचा. तृप्त होऊन समाधानाची ढेकर द्यायचा. माणसाला मात्र सावली होता येत नाही. दुसऱ्याला सुख देता येत नाही.
मी आंब्याच्या सावलीत आडवा झालो आणि हिरव्या पानांच्या गर्दीत डोळे गुंतवले. पानांच्या गाळणीतून उन्हाचे काही कवडसेसुद्धा गारवा शोधत आंब्याच्या सावलीत उतरताना दिसत होते. माझ्या शेजारच्या एका कवडश्याखाली मी हात धरला. तो कवडसा आभाळातल्या उन्हाचाच होता, पण गार लागत होतं. जणू काही आंबाच्या पानांच्या गाळणीतून आंब्याच्या सावलीत उतरलेला तो कवडसा, उन्हाचा ताप आंब्याच्या पानांवर सोडून आला होता. आंब्याच्या पानांमधला गारवा ओंजळीत घेऊन आंब्याच्या सावलीत उतरला होता. उन्हाच्या त्या कवडशालाही आंब्याच्या सावलीत विसावा घ्यायचा असल्याप्रमाणे तो आंब्याच्या सावलीच्या आश्रयाला आला होता. सावलीत उतरल्यामुळे गार झाला होता.
मला चहाच्या गाळणीतून गाळलेला चहा आठवला. चहाच तेवढा कपात उतरतो. चहाच्या पावडरीचा चोथा तसाच गाळणीत उरतो. आंब्याच्या पानांची गाळणी देखील उन्हाचा चोथा पानांच्या गाळणीत तोलून धरत होती आणि निव्वळ गारवा तेवढा जमिनीपर्यंत येऊ देत होती. शरीर सावलीच्या गारव्याला आलं होतं. मन मात्र चौखूर उधळत होतं, पण नजर काही आंब्याच्या पानांच्या पलीकडे जात नव्हती. नजरेसमोर नुसताच हिरव्या पानांचा हिरवा गुंता होता. पानातले कैऱ्यांचे घोस लक्ष वेधून घेत होते. पाखरं पानांच्या आडोशाला गोळा झाली होती. राघू मैनेचं हितगुज सुरू होतं. कैऱ्यांच्या घोसातला एखादा पाड नजरेत येत होता. असाच एक पाड गळून पडला. हात लांब करून मी तो उचलला. बाटलीत पाणी होतं. त्या पाण्याने छानसा धुतला. गोड पाड खाताना मन तृप्त होत होतं. पाड खाऊन संपला. मी साल आणि कोय दूर भिरकावून दिली. ती शेजारच्या नांगरटीत जाऊन पडली.
ऊन कमी झालं तसा मी उठून बसलो. बाजूला टाकून दिलेल्या सालीकडे आणि कोयीकडे लक्ष गेलं. साल सुकून गेली होती. कोय वाळू लागली होती. काही वेळापूर्वी आंब्याच्या पानात लपून बसलेला तो पाड आता गतप्राण झाला होता. मी त्याचं शोषण केलं होतं. मीच त्याला मरणाच्या दारात लोटलं होतं. मी त्याची साल सोलून काढली होती. पिवळ्या जर्द, घमघमीत आंब्याच्या पाडाचे अवशेष तेवढे उरले होते. आंबा खाऊन मनाला जी तृप्तीची ढेकर आली होती. पण “मी काय अथवा अन्य कुणी काय? माणूस फक्त शोषण करू शकतो.’ असे विचार मनात येऊन माझ्या मनातली तृप्तीची ढेकर गढूळ झाली. पुन्हा मनात विचार आला. समजा मी तो पाड खाल्ला नसता तर? …तर, त्या आंब्याच्या सावलीला आलेल्या एखाद्या जनावराने तो चावून खाल्ला असता. कोयीचासुद्धा भुगा केला असता. अथवा किड्या मुंग्यांनी त्यातला रस शोषून घेतला असता. मग त्या पाडाला कणाकणाने मरण भोगावं लागलं असतं. किड्या मुंग्यांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर? …तर, आपल्यातला रस वळून जाण्याची वाट बघत तो पाड पडल्या जागेवर तसाच पडून राहिला असता. आपण एखाद्या जीवाच्या तृप्तीची ढेकर होऊ शकलो नाही याचं त्याला दुःख झालं असतं. त्याच मरणासन्न अवस्थेत-
“जगण्याने सुख दिले पण मरण्याने छळले होते
इतकेच मला झाडावरूनी, तुटताना कळले होते’
असे काहीसे शब्द त्या आंब्याच्या पाडाच्या मनात आले असते. असा विचार मनात आला आणि मी सुखावलो. आंबा खाऊन आपण त्याच्यावर उपकारच केले आहेत, असं वाटून माझ्या मनातील तृप्तीचा गोडवा अधिकच वाढला, पण माणसाला अशी दुसऱ्याच्या तृप्तीची ढेकर होता येत नाही. माणूस कधी दुसऱ्याला सुख देत नाही. दूध देणार असते म्हणून माणूस गाईला चारा घालतो. खाटी झाली की खाटकाला विकून टाकतो. भिकाऱ्याच्या ओंजळीत पैसे टाकतानाही तो पुण्याची याचना करतो. मला निसर्गाचं फार कौतुक वाटतं. मुळं मातीतून जीवनमूल्ये शोषून घेतात. खोडाच्या साह्याने पानांकडे पाठवतात. झाडाची पाने तो जीवनरस शोषून हिरवीगार होतात. सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात. झाडाच्या इतर भागांना, कळ्यांना, फुलांना, फळांना पाठवतात. फळं तो जीवनरस साठवतात. माणसाच्या मुखी घालतात. पानं हवेतला कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. माणसांना जगवतात.
तो पाड खाऊन मी त्याच्यावर उपकारच केले आहेत, असा निष्कर्ष काढून मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलं. वास्तवात निसर्गात जी दातृत्वाची भावना आहे तशी भावना माणसात नाही. फुलाचा गंध फुलाला जड होत नसतो. पण फुल त्याचा गंध कधीही गाठीला बांधून ठेवत नाही. फुलं त्यांच्याजवळचा गंध वाऱ्यावर उधळून देतं. भ्रमरांना आकर्षित करतं. मधमाश्यांना साद घालतं. फुलं त्या भ्रमरांवर, मधमाश्यांवर काठी उगारत नाहीत. आपल्या कुशीत घेतात. हवं ते देतात. दुसऱ्याच्या तृप्तीची ढेकर होतात. ढग पाऊस साठवून ठेवत नाहीत. रिमझिमत बरसतात. मातीला तृप्त करतात. प्रत्येकाला असं दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या तृप्तीची ढेकर होता आलं पाहिजे.
विजय शेंडगे