World Cup 2023 India vs Bangladesh Match :- विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. हे त्याचे 48 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले मात्र, त्याच्या या शतकात त्याला मोलाची साथ देणारा लोकेश राहुलच नव्हे तर पंच रिचर्ड कॅटेलबरो (Richard Kettleborough) यांचाही मोठा वाटा आहे.
राहुलने एकेरी धावाही घेणे या सामन्यात टाळले होते. कारण कोहली शतकाच्या जवळ आलेला होता. त्याने कोहलीला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यावेळी कोहलीच राहुलला एकेरी धाव घे असे सांगत असूनही राहुलने ते टाळले व आपल्या मित्राचे शतक पूर्ण व्हावे म्हणून चौकार व षटकार तर सोडाच परंतु एकेरी धावही घेतली नाही.
यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत कोहलीचे हे पहिलेच शतक ठरले. कोहली 97 धावांवर खेळत असताना त्याने दोन षटके वायाही घालवल्याची टीका काहींनी केली. मात्र, त्यावर कर्णधार रोहित शर्माने परखड मत व्यक्त करताना कोहलीची बाजू घेतली आहे. जर संघाला विजयासाठी 2 धावांची गरज होती व त्यावेळी जवळपास 9 षटके बाकी होती. यावेळी जर एखादा फलंदाज आपली वैयक्तिक कामगिरी साकार करण्यासाठी वेळ घेत असेल तर ते मान्य करता आलेच पाहीजे. कोहलीने संघाचा विजय उंबरठ्यावर आणल्यावर आपल्या शतकपूर्वीचे प्रयत्न केले त्यात गैर काहीच नाही, असे रोहितने म्हटले आहे.
#CWC2023 #INDvBAN : विराटच्या नाबाद शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार…
त्याचबरोबर राहुलनेही कोहलीला शतकाची संधी होती तर ती हिरावून मला काय मिळाले असते, असे म्हटले आहे. विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत संघ भक्कम स्थितीत असताना आपला सहकारी खेळाडू शतकाच्या इतक्या जवळ असताना त्याला साथ देणे जास्त महत्त्वाचे असते व तेच मी केले. उलट मला कोहलीनेच एकेरी धावा घे असेही सांगितले होते. त्याला वाटत होते की शतकासाठी कोहली स्वार्थी वागला; परंतु तसे काहीही नव्हते. मीच स्वतःहून त्याचे शतक व्हावे यासाठी दुय्यम भूमिका निभावत होतो, असेही राहूल म्हणाला.
कोहलीने मागितली माफी
या लढतीत रवींद्र जडेजाची कामगिरी जास्त मोलाची होती. मात्र, माझे शतक झाल्यामुळे मलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे मी जडेजाची माफी मागत आहे, अशा शब्दांत कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. या सामन्यात मी शतकासाठी वेळ घेतला हे मी मान्य करतो; परंतु शतकाच्या इतक्या जवळ असताना व हातात भरपूर षटके असताना तसेच विजयासाठी संघाला अवघ्या 3 धावांची गरज असताना मी शतकासाठी खेळलो, असेही काहींचे मत आहे. त्यांची टीकाही मी स्वीकारतो. पण विश्वकरंडक स्पर्धेत शतकी खेळी करणे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते तसेच माझेही होते व ते पूर्ण झाले याचा मला सर्वाधिक आनंद आहे.
पंचांच्या भूमिकेचे स्वागत
बांगलादेशचा नसुम अहमद डावातील 42 वे षटक टाकत होता व कोहलीला शतकासाठी 3 तर संघाला विजयासाठी 2 धावांची गरज होती. नसुम अहमदने रडीचा डाव खेळताना लेगसाइडला पहिला चेंडू टाकला. खरेतर हा चेडू वाइड ठरवला गेला असता. मात्र, पंच रिचर्ड कॅटलबरो यांनी नसुमने हा चेंडू मुद्दाम बाहेर टाकल्याचे जाणले तसेच फलंदाज जागेवरून हलला नसता तर तो चेंडू त्याच्या पायाला लागला असता तरी वैध ठरवला गेला असता. मात्र, कोहलीचे शतक पूर्ण होऊ नये अशीच वृत्ती नसुमची आहे हे पंचांनी जाणले व हा चेंडू वाइड ठरवला नाही. आयसीसीचा नियमही हेच सांगतो. त्यानंतरचा चेंडूही कोहलीने नुसता खेळून काढला व तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत आपले शतक पूर्ण करताना संघाचा विजयही साकार केला. शतक जरी कोहलीचे झाले असले तरीही चर्चा व कौतुक पंच कॅटलबरो यांचेच जास्त झाले.