मुंबई – “भाजपसोबत जाऊ या ,नाहीतर मला अटक होईल. असे म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते”, असा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळासह मीडियामध्ये देखील जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आता स्पष्टीकरण दिल आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची काय अवस्था झाली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. सुरुवातीला शिंदेंसोबत गेलेलय आमदारांची संख्या वाढली,उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला,महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार आलं. या सर्व बदलांचे राजकारण महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर सुषमा अंधारेंनी देखील दुजोरा दिला आहे.
“लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल होत्या. त्या उघडल्या जाण्याची भीती होतीच.. म्हणून त्यांना तस वाटत होत” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच भाजपाची ती मोडस ऑपरेंडीच आहे,आमच्यासोबत आलात तर तुम्हाला वॉशिंग मशीनमधून धुवून काढू. दोषमुक्त करू, पण आमच्यासोबत आला नाहीत तर मात्र तुम्ही जेलमध्ये जाल. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेत काही वावगं आहे असं वाटत नाही” असंही माध्यमांशी बोलताना अंधारे यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते नेमकं आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे ते म्हणाले होते.” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.