मुंबई -गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
आशिष शेलार यांनी सलग चार ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करून समुद्राचे पाणी गोडे करण्याचा अट्टहास का? गेल्या 24 वर्षांत 21 हजार कोटी खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?
114% नालेसफाई करूनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात 22 हजार 500 कोटी खर्च करूनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलिंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?
मृतदेहाशेजारीच करोना रुग्णांना उपचार का दिले? परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला पुढे कसे?अशी सरबत्ती शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, करोनाच्या संकटात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केले. त्याचं कुणी घरच्यांनी कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुकासाठी काम करत नाही. कर्तव्य म्हणून करत असतो. कौतुक किती होईल याची चिंता नाही.
दूषणं देणारे अनेक आहेत. आयुक्त काय करतात, हे काय करतात? ते काय करतात? हे सगळं ठीक. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अकलेची गरज लागत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.