अरुण गोखले
टापटीप, नीटनेटकेपणा ह्याला जीवनात फार महत्त्व आहे. उगाच कोणीही कसंही राहण्यात काय अर्थ आहे. माणसानं कसं नीटनेटकं राहायला हवं. दिसायला हवं, बोलायला आणि वागायलाही हवं. एकूणच काय तर या नीटनेटकेपणाबाबत उदासीन राहून चालणार नाही. कारण त्यावरच आवतीभोवतीच्या समाजातले आपले मूल्यमापन होत असते. हा नीटनेटकेपणा, ही टापटीप आपल्या राहणीत, वागण्यात, बोलण्यात, दिसण्यातही असावी लागते.
समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोधात माणसाच्या गुण आणि दुर्गुणाचा विचार करताना, त्यावर विवेचन करताना असे सांगितले आहे की, नीटनेटकेपणा हा गुण आहे. ह्या उलट गबाळग्रंथीपणा हा दुर्गुण असे सांगितले आहे.
आता ह्याला गुण का म्हणायचे? तर जिच्याकडे हा नीटनेटकेपणा आहे ती व्यक्ती कितीही साधी असली तरी ती इतरांवर आपल्या प्रभाव पाडते. साधेपण हेही भूषण ठरते. बोलण्यातला नीटनेटकेपणा अचूकता, सफाईदारपणा हा व्यक्तीव्यक्तीतील स्नेह, मैत्री, आपलेपणा, जिव्हाळा, हा जपून आणि जागवून जातो. अशी नीटनेटकेपणाने वागणारी, राहणारी, बोलणारी व्यक्ती ही समाजात चोख, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, सहिष्णू मानली जाते.
हे नीटनेटकेपण महत्त्वाचे कागदपत्र, मौल्यवान वस्तू साठवण्याच्या, ठेवण्याच्या बाबतीत राखलं तर भविष्यातले काही तोटे, नुकसान आपण वाचवू शकतो. शोधासाठी वेळ घालवावा लागत नाही. मानसिक ताण वाढत नाही. खबरदारी हा नीटनेटकेपणाचाच एक भाग आहे. त्यामुळे हवे ते वेळच्या वेळी सापडते. खराब होत नाहीत, हरवत नाही, वाया जात नाही.
समर्थ तर पुढे जाऊन इतकेही म्हणतात की, हा नीटनेटकेपणा प्रत्येक माणसाच्या संसार प्रपंच्यातही असायला हवा. प्रपंच असावा नीटनेटका। तो नसावा फाटका तुटका।।
आता नीटनेटका प्रपंच कोणता तर जो जागेपणाने केला जातो. वाढविला जातो, जपला आणि सांभाळला जातो. मिळकत आणि खर्चाचे गणित जिथे जुळवलेले आहे. ज्या प्रपंच्याचा झेपेल इतकाच विस्तार आहे. जिथे प्रत्येक कृती विचारपूर्वकच केली जातेय.
जिथली नाती जपली जातात. जिथे अविवेकी उधळण नसते, तर काटकसर असते. दोन पैशाची बचत केली जाते. जिथे प्रत्येक पाऊल सावधगिरीनं उचललं जातं, तो प्रपंच नीटनेटका. कारण जर आपण तो इतका विचार पूर्वक नीटनेटकेपणाने केला नाही, तर प्रपंच्याची चादर ही ओढाताणीत फाटायला वेळ लागत नाही. हे विसरून चालणार नाही.