जनधनमधील रक्कम काढण्यासाठी गर्दी
पुणे – केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात या आठवड्यामध्ये काही रक्कम टाकली आहे. त्यामुळे काही बॅंक शाखांत विशेषतः ग्रामीण भागातील बॅंक शाखांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याची गरज असल्याच्या सूचना बॅंकांच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
करोना व्हायरसमुळे गर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, काही शाखांमध्ये गर्दी होत असल्याची छायाचित्रे आणि माहिती विविध समाज माध्यमावर पसरत आहे. अशा प्रकारची माहिती स्वतः बॅंक कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमावर टाकू नये, अशा सूचना स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत कसे काम करावे, या संदर्भात मार्गदर्शक सूचना बॅंक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आहेत. त्या सूचनांच्या चौकटीत कर्मचाऱ्यांनी काम करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आपली नकारात्मक मते समाज माध्यमावर टाकने टाळावे असेही सांगण्यात आले आहे.
काही ठिकाणी गर्दी झाल्यानंतर बरेच ग्राहक अयोग्य वर्तन करीत आहेत. या कामी पोलीस सहकार्य करत नाहीत असे, मत काही बॅंक कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमावर टाकल्याचे वृत्त आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पोलीस यंत्रणेला बॅंक कर्मचाऱ्यांना गर्दी कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत बॅंक कर्मचाऱ्यांनी अतिशय धीराने आणि शिस्तीने कामकाज चालू ठेवले आहे. मात्र, गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी बॅंक कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे ऑल इंडिया बॅंक एम्पलॉइज कॉन्फडरेशन म्हंटले आहे.